महाराष्ट्रातील दलित बांधवांची चळवळ
- जातीव्यवस्थेचा उगम उत्तर वैदिक काळातील वर्णव्यवस्थेतून झाला. वर्णव्यवस्था ही गुणांवर, तर जातीव्यवस्था जन्मावर आधारित होती. महाराष्ट्रात विविध समाजसुधारकांनी अस्पृश्यता निर्मूलन कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
- महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महाराज सयाजीराव गायकवाड, महर्षी वि. रा. शिंदे, गोपाळ वलंगकर, शिवराम कांबळे, किसन बंदसोडे, यांनी अस्पृश्यता निर्मूलन चळवळीतील महत्वाचे योगदान दिले आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे अस्पृश्यतानिर्मुलन कार्य
- बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे परिवर्तनवादी विचारांचे समाजसुधारक गणले जातात. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे बडोदा हे देशातील पहिले संस्थान.
- महाराजांनी औद्योगिक कलाशिक्षणासाठी बडोदा येथे 'कलाभुवन' संस्था स्थापन केली.
- 'श्री सयाजी साहित्यमाला' व 'श्री सयाजी बाल ज्ञानमाला' या माध्यमातून अनेक ग्रंथांची भाषांतरे केली.
- बालविवाह बंदी, कन्याविक्रय बंदी, पडदापद्धती बंदी, विधवा विवाह, घटस्फोटाचा कायदा, अस्पृश्यता निवारण अशा अनेक सुधारणा बडोदा संस्थानात केल्या.
- २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरलेल्या पहिल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड महाराज. अस्पृश्यांप्रती त्यांच्या समतेच्या धोरणामुळे बडोदा, अहमदाबाद येथे अनेक प्रांतातील अस्पृश्य लोक उदरनिर्वाहासाठी दाखल झाले होते.
गोपाळ बाबा वलंगकर यांचे योगदान
- ‘दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर' म्हणून विख्यात असलेल्या गोपाळ वलंगकर यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी अस्पृश्यता निर्मुलनासाठी १८९० साली दापोली येथे 'अनार्य दोष परिहारे समाज' ही संस्था स्थापन केली.
- 'विटाळ विध्वंसन' या आपल्या ग्रंथातून त्यांनी अस्पृश्यतेचे खंडन केले.
शिवराम जानबा कांबळे यांचे योगदान
- मुळचे पुण्याचे असलेल्या शिवराम कांबळे यांच्यावर गोपाळ बाबा वलंगकर, महात्मा फुले, बाबा पद्मनजी, लोकहितवादी आगरकर यांच्या विचारांचा प्रभाव होता.
- १९०२ मध्ये त्यांनी 'मराठा', 'दिनबंधू' या वृत्तपत्रांमध्ये अस्पृश्यतेविरोधी लेख लिहिले.
- १९०४ साली पुण्यात शिवराव कांबळे यांनी 'श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज' ही संस्था स्थापन केली.
- १९१० मध्ये सोमवंशीय हितवर्धक सभा आयोजित केली. या संस्थेमार्फत अस्पृश्य समाजातील तरुणांना लष्कर व पोलीस खात्यात नोकऱ्या देण्यासाठी तसेच अस्पृश्य मुलांसाठी शाळा व वाचनालये सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले.
किसन फागुजी बंदसोडे (बनसोडे) यांचे योगदान
- नागपूरच्या किसन बंदसोडे यांनी अस्पृश्यता निर्मुलनासाठी अस्पृश्यांमध्ये सामाजिक, धार्मिक जागृतीबरोबरच शैक्षणिक विकासाचे कार्य केले.
किसन बंदसोडे यांनी खालील संस्था स्थापन केल्या -
- 'सन्मानबोधक निराप्रितसमाज' ही संस्था अस्पृश्यांची शैक्षणिक, आर्थिक प्रगती साधण्यासाठी स्थापन केली.
- चोखामेळा सुधारणा मंडळ व वाचनालय सुरू करून अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय केली.
(टीप : म. फुले, शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड, महर्षी वि. रा. शिंदे, गोपाळ वलंगकर, शिवराम कांबळे, किसन बंदसोडे, गणेश अक्काजी गवई, कालिचरन नंदा गवळी यांनी चालविलेली दलित चळवळ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरपूर्व दलित चळवळ म्हणून ओळखली जाते.)
0 Comments