वासुदेव बळवंत फडके (१८४५ ते १८८३)
- जन्म : ४ नोव्हेंबर १८४५. शिरढोण (ता. पनवेल, जि. कुलाबा-रायगड)
- टोपण नाव : वासुदेवांचे आजोबा प्रेमाने त्यांना 'छकड्या' म्हणत असत.
- महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची खऱ्या अर्थाने सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली, त्यामुळे त्यांना 'आद्य क्रांतिकारक' असे संबोधले जाते.
- पेशवाईत कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी फडकेंच्या घराण्याकडे होती, मात्र मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर ही सुभेदारी गेली. उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाल्याने त्यांना इंग्रजी शिक्षण पूर्ण करता आले नाही.
- १० फेब्रुवारी १८६० रोजी 'गोपिकाबाई' यांच्याशी वासुदेवांचा विवाह.
- कन्येचे नाव : मथुताई
- फडकेंनी काही काळ GIP रेल्वेमध्ये लिपिक म्हणून, तर नंतर लष्करात लेखाविभागात नोकरी केली. आईच्या अंत्ययात्रेस उपस्थित राहता न आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व इंग्रजांविरोधी त्यांच्या मनात असंतोष वाढला. शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाहीत हे त्यांना पटले.
- वासुदेव फडके यांच्यावर न्या. रानडे व गणेश वासुदेव जोशी यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने ते सार्वजनिक सभेकडे आकर्षित झाले.
- १८७३ मध्ये त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली.
वासुदेव बळवंत फडके यांनी पुढील संस्था स्थापन केल्या :
१) ऐक्यवर्धिनी सभा : विखुरलेल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे हा हेतू.
२) ‘पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन (स्कूल) : १८७४ मध्ये स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी फडकेंनी पुण्यात ही शाळा सुरू केली. पुढे या संस्थेचे ‘भावे स्कूल' मध्ये रूपांतर झाले. फडके दत्ताचे भक्त असल्यामुळे त्यांनी 'दत्त महात्म्य' हे ५१ अध्याय व ७१७४ ओव्यांचे दत्तचरित्र लिहिले.
- १८७७ मध्ये लॉर्ड लिटन याने व्हिक्टोरिया राणीस भारताची सम्राग्नि ' हा किताब दिल्याने फडके क्रोधीत झाले. सनदशीर मार्गाने इंग्रजांचा पराभव करता येणार नाही हे पटल्यामळे त्यांनी क्रांतिकारी मार्ग अवलंबिला.
फडकेंच्या क्रांतिकार्याचे स्वरूप :
- २० फेब्रुवारी १८७९ नंतर फडके यांनी रामोशी, कोळी, भिल्ल, माग, हरिजन, मुसलमान आदी जातीधर्मातील सहकाऱ्यांना एकत्र करून पुणे परिसरात श्रीमंतांवर दरोडे घालण्यास प्रारंभ केला.
- दौलतराव नाईक यांच्या मदतीने फडकेंनी लोणीजवळील धामरी या गावी पहिला दरोडा घातला. त्यानंतर खेड, वाल्हे, पुरंदर येथे दरोडे घातले. लुटीतील पैशाचा विनियोग त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी केला.
- सरकारी खजिन्यांपेक्षा फडकेंनी श्रीमंतांना लुटण्यास प्राधान्य दिले. दरोड्यांच्या माध्यमातून फडकेंनी कोकण व पुण्यासह सात जिल्ह्यांत ब्रिटिशांविरोधी मोहिम उभारली. आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढवून साधूचा वेश धारण केला व जनजागृती करत फिरत राहिले. वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांना उद्देशून दोन जाहीरनामे काढून बंडाची धमकी दिली.
- पोलीस प्रमुख मेजर डॅनियल याने फडकेंच्या '१२९, शुक्रवार पेठ, पुणे' या पत्त्यावर धाड टाकून शस्त्रास्त्रे जप्त केली व फडकेंवर अटक वॉरंट काढले.
- मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी फडकेंना पकडणाऱ्यास चार हजार रुपयांचे बक्षिस घोषित केले. त्याविरोधात फडकेंनी रिचर्ड टेम्पल यांचे डोके उडविणाऱ्यास दहा हजार रुपयांचे बक्षिस घोषित केले.
- २३ जुलै १८७९ रोजी विजापूरजवळील देवर नावडगी येथे फडके यांना अटक करण्यात आली.
- २२ ऑक्टोबर १८७९ पासून न्या. अल्फ्रेड केसर यांच्यासमोर खटला सुरू झाला. सार्वजनिक काका ऊर्फ ग. वा. जोशी आणि महादेव चिमाजी आपटे यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यानंतर फडकेंवर ब्रिटिशांविरुद्ध युद्धाचा आरोप ठेवून हा खटला सत्र न्यायाधीश न्यूनहॅम यांच्याकडे सोपविण्यात आला.
- भारतीय दंडविधान संहिता कलम १२ अ, १२२ व १२४ नुसार फडके यांच्यावर समाजात असंतोष पसरविण्याचा आरोप ठेवण्यात आला. महादेव चिमाजी आपटे यांनी उच्च न्यायालयात फडकेंच्या बचावाचे काम पाहिले. मात्र फडकेंना राजद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेप सुनावण्यात आली.
- ३ जानेवारी १८८० रोजी 'तेहेरान' बोटीने फडकेंना येमेन देशातील एडन येथील तुरुंगात धाडण्यात आले. १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडनच्या तुरुंगात वयाच्या ३७ व्या वर्षी क्षयरोगामुळे त्यांचा मृत्यू झाला.
- १) इंग्रजी वृत्तपत्रांनी वासुदेव बळवंत फडके यांची दरोडेखोर म्हणून संभावना केली.
- २) बंगालच्या अमृत बझार पत्रिकेने नोव्हेंबर १८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष' या शब्दांत केला.
- ३) विश्राम बेडेकर यांनी १९५० साली 'वासुदेव बळवंत' हा चित्रपट दिग्दर्शित केला.
0 Comments